शालेय इतिहास

१ जून १९८७ रोजी “ज्ञान हेच सामर्थ्य“ हे ब्रीदवाक्य घेवून ‘झुंद‘ या छोटेखानी बंगल्यात अवघ्या ५० विद्द्यार्थ्यांनासह श्री.चंद्रकांत रेणावीकर व रेणावीकर बंधुंनी अहमदनगर शहराच्या सावेडी उपनगरात वैदुवाडी परिसरात बालवाडी, १ली, २री चे वर्ग सुरू करून कै.दा.शं. रेणावीकर विद्द्यामंदिरची मुहूर्तमेढ रोवली.

सन १९८७ ते १९९० या ३ वर्षात शाळा झपाट्याने वाढली आणि बालवाडी, इ.१ली ते ७ वी प्राथमिक विभाग आणि इ.८वी ते १०वी माध्यमिक विभाग असा रेणावीकर शिक्षण संस्थेचा विकास झाला. सन १९९० मधे संस्था स्वत:च्या हक्काच्या जागेत स्थलांतरीत झाली.

१९९७ पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व विभागांना १००% अनुदान प्राप्त झाले. प्रत्येक वर्गाच्या २-२ तुकड्या
जवळपास १५०० विद्द्यार्थी आणि ५० ते ६० चा अनुदानित आणि विनाअनुदानित स्टाफसह शाळा सावेडी उपनगरात नावलौकिकासह येवू लागली.

सन १९९७ ला १४ ऑगस्ट्ला भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि विद्द्यालयाची दशकपूर्ती याचे औचित्यसाधून भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम, विद्द्यालयाला विद्द्युतरोषणाई, विविध स्पर्धा, संचलन असा सोहळा साजरा करण्यात आला.

सन १९९८ मध्ये विद्द्यालयाच्या प्रगतीचा वाढता आलेख पाहता शासनाचे रु.१०,०००/- चे क्रिडा अनुदान विद्द्यालयास मिळाले व भव्य असा क्रिडा सप्ताह विद्द्यालय व जि.प. क्रिडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.

सन २००४ मध्ये संस्थेच्या इतिहासात सर्वात मोठा बदल झाला. रेणावीकर शिक्षण संस्था अहमदनगर ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्याकडे ह्स्तांतरीत झाली.

विद्द्यालयाचे नामकरण आता. म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळा, म.ए.सो कै.दा.शं. रेणावीकर विद्द्यामंदिर, म.ए.सो रेणावीकर माध्यमिक विद्द्यालय असे झाले आणि व्यवस्थापनाचा कारभार नविन कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला.

सन २००५ मध्ये अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ,अहमदनगर

जिल्हा शिक्षण विभाग (माध्यमिक) यांच्या संयुक्त विद्द्यमाने आयोजित महात्मा फुले गुणवत्ता वाढ व विकास अभियन अंतर्गत माध्यमिक विभाग ५०० पेक्षा कमी संख्या असलेल्या गटात विद्द्यालयास प्रथम क्रमांक प्राप्त झाला.

म.ए.सो. पुणे या संस्थेच्या वटवृक्षाखाली अहमदनगरची घटक शाळा गुणवत्तेमध्ये वाढ करतच होती.त्याच बरोबर भौतिक सुविधांमध्येही भर घालण्याचे कार्य संस्थेने हाती घेतले. ज्यामध्ये शासनाच्या समृद्ध शाळा योजनेच्या अनुषंगाने भव्य तीन मजली स्वछतागृह बांधकामाचा शुभारंभ सप्टें २०११ मध्ये करण्यात आला.

म.ए.सो. पुणे या मातृशिक्षण संस्थेला सन २००९-१० मध्ये १५० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने प्रत्येक घटक प्रशालेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून निधी-संकलनाची मोहिम राबवण्यात आली. ज्यामध्ये अहमदनगर प्रशालेने ही ‘अमर –आग‘ या श्री. मंदार परूळेकर निर्मित आणि दिग्दर्शीत संगीतमय राष्ट्रभक्तिपर गीतांचा सुंदर कार्यक्रम आयोजीत केला. व जवळपास अडीच लाखाचा निधी संस्थेस दिला.

९ ऑगस्ट २०१५ क्रांतिदिनाच्या औचित्याने प्राथ. विभागाच्या मुख्याध्यापिका कै. अलका जोशी यांच्या पुढाकराने व खास प्रस्ताव केल्यानुसार विद्द्यालयाच्या समोरील वाहतुकीच्या रस्त्यास आद्यक्रांतीकारक वासुदेव बळ्वंत फडके मार्ग असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार, महापौर, संस्था पदाधिकरी, परिसरतील नागरीक, विद्द्यार्थी व पालकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जून २०१६ मध्ये रेणावीकर माध्यमिक विद्यालयाच्या दुस-या मजल्यावरील विस्तारित बांधकामास सुरुवात झाली आणि अवघ्या १० महिन्यात हे कार्य पूर्णत्वास गेले आणि ३१ मार्च २०१७ रोजी विद्यालयाच्या इमारतीचा अर्पण सोहळा आणि सभागृहास ज्येष्ठ संघ कार्यकर्ते मा. श्री. दामोदर माधव तथा दामुअण्णा दाते सभागृह असे नामकरण देणे असा भव्य कार्यक्रम झाला.

सन २०१६-१७ मध्ये विद्यालयाचा शैक्षणिक विस्तार होताना उच्चमाध्यमिक विद्यालयाच्या शास्त्र आणि वाणिज्य शाखेस शासनाची मान्यता मिळाली आणि ११वी सायन्सचा वर्ग सुरु करण्यात आला.

सन २०१९ मध्ये विद्यालयाला केंद्र सरकारची भव्य अशी Atal Tinkering Lab मिळाली. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना भिन्न-भिन्न वैज्ञानिक प्रयोग करण्याची संधी मिळाली.

म.ए.सो. पुणे यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली शाळा पर्यावरण संवर्धन, समाज प्रबोधन व सामाजिक कार्य, राष्ट्रीय कालानुरूप मातृभाषेतून शिक्षण, आरोग्य विज्ञान व क्रीडा, उद्योजकता व कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, विज्ञान, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संस्कृती संवर्धन या आयामांची कास धरून प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.